मुंबई : मध्य रेल्वेच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणार्या ठाणे-दिवा दरम्यानच्या 5 व्या-6 व्या मार्गापैकी 5 व्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. काल 23 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉक दरम्यान हे काम पूर्ण झाले असून 6 व्या मार्गिकेचे कामही काही दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने ही 5 वी-6 वी मार्गिका अत्यंत महत्वाची आहे. गेल्या 14 वर्षापासून त्याचे काम सुरु असून खा. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे त्याला मोठी गती प्राप्त झाली आहे. परिणामी अवघ्या काही महिन्यातच हे काम अंतिम टप्प्यात आले असून काल 5 व्या मार्गिकेचे काम पुर्णत्वास गेले. तसेच पूर्ण झालेल्या या मार्गाची रेल्वे प्रशासनाने रिकामी लोकल चालवून चाचणीही केली. तर 6 व्या मार्गिकेसाठी येत्या 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यानचा 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.
सद्यस्थितीत या मार्गावर धावणार्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे उपनगरीय गाड्यांच्या गतीवर परिणाम होत आहे. अनेकवेळा एक्सप्रेस क्रॉसिंगकरीता लोकल गाड्या थांबवून ठेवाव्या लागतात. परंतु या 5 व्या आणि 6 व्या रेल्वे मार्गिका खुल्या झाल्यावर जलद, धीम्या लोकल सेवा आणि एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहेत.