संविधान समर्थनात सोमवारी २७ ऑक्टोबरला महामोर्चा !आंबेडकरीवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष, संघटनांचा निर्धार

संविधान समर्थनात सोमवारी २७ ऑक्टोबरला महामोर्चा !आंबेडकरीवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष, संघटनांचा निर्धार

संविधान समर्थनात सोमवारी २७ ऑक्टोबरला महामोर्चा !

आंबेडकरीवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष, संघटनांचा निर्धार

मोर्चात हजारो संविधान प्रेमी, आंबेडकरी, बहुजन सहभागी होणार !

कोल्हापूर, दि. २१ (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अवमान प्रश्नी संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळलेली आहे. आंबेडकरवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी, संविधान प्रेमी जनतेने आंदोलने केलेली आहेत. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या पुरोगामी भूमीमध्ये एकत्रितरित्या आंदोलनाचा आवाज बुलंद करण्यासाठी आज आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना व पुरोगामी संघटनांच्या बैठकां सुरू आहेत.
सोमवार दि. २७ ऑक्टोबर रोजी बिंदू चौक, कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही संविधान सन्मान महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चा मध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातून हजारों संविधान प्रेमी जनता सहभागी होणार आहे असे आंबेडकरी समाज पक्ष संघटनेचे निमंत्रक प्रा. शहाजी कांबळे यांनी जाहीर केले आहे.
प्रा. विजय काळेबाग यांनी या भूमिकेला पाठिंबा व्यक्त करत संविधानाला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने होत असलेले प्रयत्न भविष्यात लोकशाही धोक्यात आणण्यासाठीच आहेत त्याला मोठ्या ताकदीने आणि विचारांनी प्रतिकार करु असे सांगितले. कोल्हापूरच्या शाहू भूमीतून अचूक नियोजन करत या मोर्चाने सुरुवात केली जाईल अशी भूमिका ज्येष्ठ नेते व्यंकाप्पा भोसले यांनी मांडली.
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते बी. के. कांबळे म्हणाले की, या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आणि गावोगावी प्रचार यंत्रणा राबवली जाईल, आंबेडकरी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी घराघरातून बहुजनवादी जनतेने बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले. बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी आंबेडकरी चळवळ ही मातंग समाजाचा थोरला भाऊ म्हणून आम्ही या मोर्चात सहभागी होणार आहोत असे जाहीर केले.
सिटी क्रिमिनल बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. दत्ताजीराव कवाळे यांनी भूषण गवई यांचे अवमान बाबत संपूर्ण घटना विषद करून मातंग समाजाला सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.
सिटी क्रिमिनल बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. रणजीत कवाळे यांनी भूषण गवई यांचेवर हल्ला झाला नसून, हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची दुरुस्ती करत मोर्चास सर्व वकील फोरम उपस्थित ठेवण्याचे जाहिर केले.
यावेळी पांडुरंग कांबळे, सुरेश सावर्डेकर, विद्याधर कांबळे, संजय जिरगे, रूपाताई वायदंडे, अनिल धनवडे, बबन शिंदे, निवास सडोलीकर, बाजीराव नाईक, भाऊसाहेब काळे, जयसिंग जाधव, सुजित समुद्रे, गोपाळ साठे, सोमनाथ घोडेराव, बाळासाहेब कांबळे, यशवंत कांबळे, भीमराव कांबळे, शशिकांत कांबळे, मच्छिंद्र कांबळे, प्रमोद सनदी, प्रताप बाबर यांनी यांनी भूमिका मांडली.
बैठकीस ॲड. विवेक सावंत, अनंत मांडुकलीकर, संभाजी भोसले, सलमान मौलवी, अर्जुन म्हाकवेकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कामत, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन कांबळे, रमेश कांबळे हुपरीकर, अक्षय साळवी, दयानंद दाभाडे, प्रवीण आजरेकर, विनोद शिंदे, बटू भामटेकर, शैलेश सोनुले, भालचंद्र दबडे, प्रतीक कांबळे, अविनाश कांबळे, राकेश कांबळे, लताताई नागावकर, वंदना कांबळे, वंदना वाघमारे, हेमाश्री यादव, रुपाली वराळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी के.एम.टी. कर्मचारी महासंघाने मोर्चास पाठिंबा व्यक्त केला. बैठकिस मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. व्यंकाप्पा भोसले यांनी भटक्या विमुक्तांचा पाठिंबा जाहीर केला. ओबीसी सेवा संघाचे दिगंबर लोहार यांनी ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी होईल हे जाहीर केले. भटक्या विमुक्तांचे संभाजी भोसले यांनी आपल्या पारंपारिक वेशात हजर राहण्याचे जाहीर केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *