काल राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात राज्यातील पीएनजी वापरकर्त्या गृहिणींसह सीएनजी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. सीएनजी पीएनजी निर्मितीसाठी वापरण्यात येणार्या नैसर्गिक वायूवरील मूल्य वर्धित करात थेट १३.५० टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा अर्थ मंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे पीएनजी आणि सीएनजी वायूचे दर सुमारे ५ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर मुंबईत घरगुती पाईप गॅस अर्थात पीएनजीचे दर ३९ .५० रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. गेल्या वर्षभरात पीएनजी दरात २९.५० रुपयांवरून ३९.५० रुपयांपर्यंत म्हणजेच ३५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. परिणामी, अर्थ संकल्पातील या घोषणेमुळे पीएनजी दर ३५ रुपयांपर्यंत कमी होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.