
सातारा/ मुंबई दि. 4 – रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी मोठ्या पक्षांना सत्ता मिळवून देण्यात मोठी मदत करणारा पक्ष आहे.या पक्षाला वाढवायचे आहे. आताच्या विधानसभा निवडणुकीतही मिळतील त्या जागांवर लढणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यानी कामाला लागुन महायुतीचे सरकार आणावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट़ीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. त्याचबराबर देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही मात्र बदल आणि आरक्षण हटविण्याचा कोण विचार करणार असेल तर याद राखा, उद्या मरायचे ते आज मरु. वाघ नखे मला मिळाली तर संविधान बदलण्याचा विचार करणाऱ्यांचा कोथळा काढू असा इशाराही ना. रामदास आठवले यांनी दिला.

सातारा येथे तालीम संघ मैदानावर रिपाइंच्या 67 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित मेळाव्यात ना. रामदास आठवले बोलत होते.
यावेळी माजी मंत्री अविनाश महातेकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सीमाताई आठवले, जीत आठवले, गौतम सोनवणे; सिद्धार्थ कासारे; चंद्रकांता सोनकांबळे; शिलाताई गांगुर्डे, मेळाव्याचे संयोजक अशोक गायकवाड, सुर्यकांत वाघमारे, स्वप्निल गायकवाड, अण्णा वायदंडे रमेश मकासरे, विजय वाकचौरे, सुरेश बार्शिंग, श्रीकांत भालेराव,बाळाराम गायकवाड, प्रकाश लोंढे, विजय आगलावे, दयाळ बहादुर,अनिल गांगुर्डे, यांच्यासह राज्यातील रिपाइं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रिपब्लीकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी अशोक गायकवाड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणखी काही वर्षे असते तर रिपाइं पक्ष मोठा झाला असता. देशाच्या राजकारणालाही वेगळी कलाटणी मिळाली असती. आता आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्देशाप्रमाणे आपण सत्तेपर्यंत पोहोचलोय. यापुढे संपूर्ण देशात पक्ष घेऊन जाण्याचे मिशन आहे.
कॉग्रेसचे राहुल गांधी यांनी संविधान बदलणार म्हणून चर्चा घडवुन आणली. पण संविधान बदलता येणार नाही. तरीही कोणी आमच्या पायावर पाय देत असेल तर आम्ही काय करायचे ते ठरवू, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला पेटवायला नाही तर विझवायला शिकवले आहे.आम्ही हिंसा नाही अहिंसा मानतो. पेटविण्या पेक्षा पटविणे महत्वाचे असून आमची भूमिका आम्ही पटवून देण्याचे काम करीत आहोत असेही केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी पक्षाने भाजपकडे विधानसभेच्या 18 ते 20 जागांची मागणी केली आहे. निवडणुक लढवुन विधानसभेत पक्षाच्या कार्यकर्त्याला पाठवुया असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. अशोक गायकवाड म्हणाले की, ना. रामदास आठवले भाजपबरोबर सत्तेत गेले नसते तर विकास झाला नसता. थे जातीयवाद्यांबरोबर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराबरोबर गेले आहेत. त्यांच्यामुळेच पक्ष जिवंत आहे.