प्रतिभावंत कलाकारांच्या अभिनयामुळे संघर्षाला बळ : बच्चूभाऊ कडू
पुण्यात ‘प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव’ उत्साहात; डॉ. दगडू माने यांचा विशेष सत्कार
पुणे : प्रतिनिधी
“बोथट ठरलेल्या सरकारच्या संवेदना जागे करण्याची ताकद कलेमध्ये असते. लघुपट आकाराने छोटा असला, तरी त्यातील विषय मोठा असतो. अशा दृश्यकलेतूनच खऱ्या अर्थाने सामाजिक संघर्षाला बळ मिळते,” असे प्रतिपादन माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले.
पुणे येथे अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने ‘प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव’ व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवात राज्य शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ मिळाल्याबद्दल शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते डॉ. दगडू माने यांचा बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
परिवर्तनाची विचारधारा महत्त्वाची
कार्यक्रमाचे संयोजक संदीप मोहिते-पाटील यांनी स्वागत केले. लघुपटांच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश समाजात पोहोचवण्यात हा महोत्सव यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. बच्चूभाऊ कडू पुढे म्हणाले की, “संदीप मोहिते-पाटील यांच्या पुढाकारातून लघुपटांच्या माध्यमातून परिवर्तनाची विचारधारा रुजवली जात आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो.”
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यात विविध श्रेणीतील विजेत्या लघुपटांना बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया, अश्विनी धायगुडे-कोळेकर, संगीत व चित्रपट अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांच्यासह संतोष लांडे, व्यंकटेश कदम, कविता गायकवाड, भट्ट चौधरी, संभाजी कांबळे, शैलेंद्र अडसूळ, हिरामण मनोहर, मारुती पोतदार, विश्वासराव पाटील, योगेश पाटील, प्रमोद जुगडे, राजेंद्र प्रधान, सचिन पाटील आदी मान्यवर व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
