नवी दिल्ली : पहिल्या लॉकडाऊनला आता दोन वर्षे होत आहेत. केंद्र सरकारने कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका असला तरी दोन वर्षांपूर्वी घातलेले सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज बुधवारी याचे आदेश जारी केले आहेत.
येत्या ३१ मार्चपासून देशातील कोविड-१९ प्रतिबंध उठविण्यात आले आहेत. आता फक्त दोन गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. यामध्ये सहा फुटांचे अंतर आणि मास्क घालणे पाळावे लागणार आहे. हे नियम आधीसारखेच लागू राहणार आहेत.
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७७८ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. आधीच्या तीन लाटांमध्ये अशी परिस्थिती कधीच आली नव्हती. मात्र, ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या कमी झालेली असली तरी रुग्णांच्या मानाने ती खूप जास्त आहे. परिस्थिती आटोक्यात आल्याने केंद्र सरकारने डिजास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचे रुग्ण वाढू लागले तर पुन्हा तो लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी DM कायदा लागू करणारा आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या पत्रात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डीएम कायद्यांतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे काढून टाकण्यास सांगितले आहे.
देशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले; मात्र दोन गोष्टी पाळाव्या लागणार
