राष्ट्रहिताचा विचार म्हणजेच संस्कृती संस्कार – देवदत्त राजोपाध्ये
इचलकरंजी/प्रतिनिधी –
बहुजन समाजास बरोबर घेऊन राष्ट्रहिताचे कार्य करीत भारतीय संस्कृती इतिहास टिकवून ठेवण्याचे कार्य ब्राह्मण ज्ञाती-बांधवांनी करावे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा मंत्र जपत चांगल्या गोष्टींचे कौतुक करताना वाईट गोष्टींना फटकारण्याचे धारिष्ट्य ठेवावे. भारतीय संस्कृतीमधील वेद परंपरेतील मर्म समजावून सांगत समाजाने जागृत राहुन स्पर्धा परीक्षांबरोबरच वेद अध्ययनाची परंपरा जपावी, असे मत शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक देवदत्त राजोपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील सुवर्ण महोत्सवी ब्राह्मण सभा इचलकरंजी यांचेवतीने प्रतीवर्षीप्रमाणे 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण समारंभ श्री. ना. बा. घोरपडे नाट्यगृहात संपन्न झाला यंदाचा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक विनायक विठ्ठल गद्रे यांना इचलकरंजी संस्थानचे अधिपती श्रीमंत यशवंतराव घोरपडे सरकार यांच्या उपस्थितीत हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री. राजोपाध्ये बोलत होते.
सभारंभाचे प्रमुख अतिथी प्रा. दीपक देशपांडे यांनी, भारतीय वेदाध्ययन परंपरेत उच्चारशास्त्राचा किती सुक्ष्म विचार आहेत हे सांगत ब्राह्मण समाजाने आपले स्थान टिकविण्यासाठी अंतर्मुख होऊन विचार करावा असे मत व्यक्त केले. त्यांनी यावेळी आपल्या खुमासदार शैलीत व्यक्तिची बोलण्याची ढब, बदलत जाणारी भाषा, राजकीय नेत्यांची बोलण्याची लकब सादर करीत उपस्थितांचे मनोरंजनातून प्रबोधन केले.
ब्रह्मवृंदांनी सादर केलेल्या ईशस्तवनानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन भगवान परशुराम, लोकमान्य टिळक, अधिपती श्री नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गायक मनीष आपटे यांनी स्वागतगीत म्हटले तर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुरेश जोशी व विश्वस्त मुकुंद फाटक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक व कार्याचा आढावा श्रीपाद कुलकर्णी यांनी घेतला. अध्यक्ष तसेच प्रमुख मान्यवरांचा परिचय दिगंबर कुलकर्णी, डॉ. पद्मनाभ कुलकर्णी, संजय मैदर्गी, प्रा. मिलिंद दांडेकर, शैलेश गोरे, सतीश पळसुले, दिग्विजय कुलकर्णी, सौ. दिपाली फडके व केदार कुलकर्णी यांनी केला. मानपत्र वाचन मनीष आपटे यांनी केले.
यावेळी सौ. विनया विनायक गद्रे यांचा सत्कार अर्पणाताई हेमंत कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आला. तसेच इचलकरंजीचे अधिपती यशवंतराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सौ. सायली सांभारे, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. अरविंद कुलकर्णी, अमोद ठाकूरदेसाई, यांना ‘श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले. वेदसम्राट कै. सखाराम महेश्वर पाध्ये गुरुजी यांचे स्मरणार्थं वेदोनारायण पुरस्कार घनपाठी वेदमूर्ती श्री. मंदार महेश पुजारी यांना प्रदान करण्यात आला. तसेच ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी, व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सुमारे तीन तास चाललेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन मनीष आपटे व सौ. रुपाली दिवाण यांनी केले. आभार प्रकटीकरण किरण दंडगे यांनी तर सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी गायलेल्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी अॅड. सहस्रबुद्धे, मनोहर जोशी, इंजिनिअरींग क्षेत्रातील उद्योजक, डेक्कन स्कुलचे विद्यार्थी, जिजीबाई शिशू वर्गाचे बालक, शिक्षकवृंद, ब्राह्मण समाज ज्ञाती बांधवांबरोबरच इचलकरंजी पंचक्रोशीतील नागरिक बंधु-भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.
Posted inकोल्हापूर
राष्ट्रहिताचा विचार म्हणजेच संस्कृती संस्कार – देवदत्त राजोपाध्ये
