(विशेष प्रतिनिधी उदय नरे)
श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कणेरी, कोल्हापूर येथे सोमवार, दि. ३० सप्टेंबर व मंगळवार, दि.१ ऑक्टोंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील संतांचे भव्य “संत समावेश” कार्यक्रमाचे श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाच्या पावन भूमीत आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मा.उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह आध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतांच्या दिव्य परंपरेला उज्वल असा वारसा आहे तोच वारसा आज हजारो संत, महंत, मठाधिपती, धर्माचार्य, किर्तनकार, प्रवचनकार चालवत आहेत. प्रत्येक अध्यात्मिक प्रमुख आपल्या परीने समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे. हि सृजन शक्ती एकत्रित यावी व त्यातून समाजाच्या सर्वांगीण विकासाचे नवनीत निघावे यासाठी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थांचे मठाधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या संकल्पनेतून या “संत समावेश” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय “संत समावेश” या कार्यक्रमात एकूण आठ सत्र होणार असून त्यात प्रामुख्याने समाज प्रबोधन, राष्ट्ररक्षण,राष्ट्र उन्नती, समाज उन्नती, धर्मरक्षण आदी विषयांवर सकारात्मक विचार मंथन होणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील विखुरलेल्या सर्व संप्रदायाच्या घटकांना एकत्रित करून समाजासाठी अमुल्य योगदान देण्यासाठी हि शक्ती प्रवृत्त करणे व मंथन-कृतीतून देश पुनः विश्वगुरु स्तरावर नेण्यासाठी पाउल टाकणे हा या “संत समावेशा” मागचा उद्देश असल्याची माहिती श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानचे विश्वस्त उदय सावंत यांनी दिली. या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सर्व संप्रदायाचे प्रमुख, साधू, संत, महंत, वारकरी, किर्तनकार , प्रवचनकार, प्रबोधनकार, अध्यात्मिक प्रमुख, मठाधिपती यांच्यासह विचारवंत इत्यादी केवळ निमंत्रित सहभागी होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.