राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे (प्रतिनिधी):
फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२५ मध्ये, डॉ. रिता मदनलाल शेटीया लिखित सर्जनशील लेखन (‘क्रिएटिव्ह रायटिंग’) या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले.

प्रमुख पाहुण्या विनिता देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि ज्येष्ठ पत्रकार, कॉर्पोरेट सिटीझन तसेच मनी लाइफ मासिकाच्या संपादिका विनिता देशमुख यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी डॉ. रिता यांना शुभेच्छा दिल्या.
‘क्रिएटिव्ह रायटिंग’ आजच्या काळाची गरज
प्रमुख पाहुण्या विनिता देशमुख यांनी आपल्या भाषणात ‘क्रिएटिव्ह रायटिंग’चे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “आजच्या काळात सोशल मीडिया आणि विविध प्लॅटफॉर्मवर लेखनाच्या संधी उपलब्ध आहेत. तुमचे लेखन वाचकांना आकर्षित आणि खिळवून ठेवणारे असले पाहिजे. यावरच हे पुस्तक आधारित आहे, ज्यात उत्कृष्ट लेखन कसे करावे, लेखन करताना कोणत्या पायऱ्यांचा वापर करावा आणि लेखनाचे नियम या सर्वांचा समावेश आहे.”
नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकाची रचना
डॉ. रिता शेटीया यांनी सांगितले की, हे पुस्तक नवीन शैक्षणिक धोरणानुसार निवड-आधारित क्रेडिट सिस्टम (Choice-Based Credit System) लक्षात घेऊन तयार केले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गरज, आवड लक्षात घेऊन ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ विषयाबद्दलचे विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि आवड वाढवण्यासाठी हे सोप्या आणि स्पष्ट भाषेत लिहिले आहे.
- पुस्तकातील चार प्रमुख प्रकरणे:
- सर्जनशील लेखनाची मूलभूत तत्त्वे
- सर्जनशील लेखनाचे घटक
- सर्जनशील लेखनाचे पारंपारिक प्रकार
- सर्जनशील लेखनातील नवीन ट्रेंड
संकल्पना चांगल्या प्रकारे समजाव्यात यासाठी पुस्तकात अर्थ, महत्त्व, चित्रे आणि फॉर्म यांचा समावेश केला गेला आहे. क्रेडिट सिस्टम विद्यार्थ्यांसाठी नवीन असल्यामुळे, विद्यार्थ्यांचे सर्जनशील लेखन कौशल्य वाढेल यावर भर देऊन पुस्तकाला सोपे आणि योग्य बनवण्यात आले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी टी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. सुनील भंडगे, सरस्वती मंदिर नाईट महाविद्यालयाचे ग्रंथपाल राजेश अगवणे, सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनीताई बिवलकर आणि माजी शिक्षिका डॉ. सविता शेटीया यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माळी यांनी केले आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मर्सी नुअमनीलम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
