
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी विश्वकोश अर्थशास्त्र नोंदलेखन कार्यशाळा’ ३० जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली. ज्ञानाचा हा अनमोल ठेवा समृद्ध करण्यासाठी राज्यभरातून अर्थशास्त्र विषयाचे तज्ज्ञ आणि संशोधक यावेळी एकत्र आले होते.
तज्ज्ञांचा सहभाग आणि मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व ‘चेतना’ संस्थेचे संचालक डॉ. महेश कोलतमे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. संतोष दास्ताने, प्रमुख मार्गदर्शक डॉ. मनोज गायकवाड, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, विश्वकोश मंडळाचे संतोष गेडाम, गोखले संस्थेचे डॉ. राजेश दनाने आणि एस.एन.डी.टी.चे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुभाष पाटील उपस्थित होते.
विश्वकोश: ज्ञानाचे अधिकृत व्यासपीठ
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कोलतमे यांनी अधोरेखित केले की, “आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातही विश्वकोशाचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. इंटरनेटवर माहितीचा महापूर असला तरी, विश्वकोशावर मिळणारी माहिती तज्ज्ञांकडून प्रमाणित केलेली असल्याने ती अधिकृत आणि विश्वासार्ह ठरते.”
प्रमुख पाहुणे डॉ. संतोष दास्ताने यांनी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “नवीन तंत्रज्ञानामुळे आज जागतिक स्तरावर मराठी विश्वकोश पोहोचला असून, एका क्लिकवर ही माहिती सर्वांना उपलब्ध होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.”
नोंदलेखनाचे तांत्रिक प्रशिक्षण
मराठी विश्वकोशाचे सहायक संतोष गेडाम यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे विश्वकोशासाठी नोंद कशी लिहावी, त्याची रचना कशी असावी आणि महत्त्वाचे मुद्दे कोणते असावेत, याचे सविस्तर प्रशिक्षण दिले. डॉ. मनोज गायकवाड यांनी यावेळी ‘मराठी विश्वकोश परिचय परीक्षा’ हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यात व्यापक स्तरावर राबविण्याची सूचना केली.
१०० हून अधिक संशोधकांचा सहभाग
या कार्यशाळेसाठी पुणे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, सातारा, सांगली, ठाणे, चिपळूण आणि नांदेड यांसारख्या विविध जिल्ह्यांतून १०० हून अधिक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या समारोप सत्रात मुक्त चर्चासत्र घेऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले व सर्वांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी केले. या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.
