UGC समता नियमावलीवरील स्थगितीचा कोल्हापुरात पँथर आर्मीकडून तीव्र निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर | प्रतिनिधी
उच्च शिक्षण संस्थांमधील SC/ST/OBC विद्यार्थ्यांवरील भेदभाव रोखणाऱ्या ‘UGC समता नियमावली २०२६’ ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. पँथर आर्मी – स्वराज्य क्रांती सेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने या स्थगितीचा जाहीर निषेध करण्यात आला असून, जिल्हाधिकारी आणि शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना ईमेलद्वारे खणखणीत निवेदन धाडण्यात आले आहे.
शाहूंच्या भूमीत अन्याय खपवून घेणार नाही!
राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या भूमीत विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांवर ही गदा असून, यामुळे भेदभाव करणाऱ्या प्रवृत्तींना मोकळे रान मिळेल, अशी भीती पँथर आर्मीचे जिल्हाध्यक्ष मचिंद्र रुईकर यांनी व्यक्त केली आहे. विद्यापीठांमधील मानसिक छळ आणि संस्थात्मक भेदभाव रोखण्यासाठी १५ जानेवारी २०२६ रोजी लागू झालेले हे नियम अत्यंत आवश्यक होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पँथर आर्मीच्या प्रमुख मागण्या:
- भक्कम बाजू मांडा: केंद्र सरकारने १९ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या सुनावणीत ख्यातनाम कायदेतज्ज्ञांमार्फत भक्कम बाजू मांडून ही स्थगिती उठवावी.
- जुनी नियमावली लागू करा: नवीन नियमांना स्थगिती असली तरी, २०१२ ची ‘अँटी-डिस्क्रिमिनेशन’ नियमावली कोल्हापुरातील सर्व महाविद्यालयांत कठोरपणे लागू करावी.
- स्वतंत्र हेल्पलाईन: विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्रलंबित न ठेवता विद्यापीठाने २४/७ स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करावी.
- अधिकारी नेमणूक: प्रत्येक महाविद्यालयात ‘अँटी-डिस्क्रिमिनेशन ऑफिसर’ची तात्काळ नेमणूक करावी.
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
जर केंद्र सरकारने न्यायालयात लेचीपेची भूमिका घेतली किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड केली, तर पँथर आर्मी केवळ कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले यांनी दिला आहे. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे आणि जिल्हा महासचिव नितेश कुमार दिशांत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

