
नवे दानवाड : “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लढा हा केवळ एका समाजासाठी नव्हता, तर तो संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी होता. आजच्या काळातही समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी विचारांची आणि संघर्षाची नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते कॉम्रेड शंकर पुजारी यांनी केले.
नवे दानवाड ता शिरोळ येथे पँथर आर्मीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी पँथर आर्मीचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघर्षाची नवी दिशा आपल्या मार्गदर्शनात कॉ. शंकर पुजारी यांनी पँथर आर्मीच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत या संघटनेने तरुणांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम केले आहे. रंजल्या-गांजलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केवळ घोषणाबाजी करून चालणार नाही, तर सनदशीर मार्गाने आणि वैचारिक अधिष्ठानावर आधारित लढा द्यावा लागेल.
तरुणांना आवाहन सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना पुजारी यांनी तरुणांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा मंत्र आजच्या पिढीने प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे. व्यसनाधीनता आणि चुकीच्या मार्गांपासून दूर राहून समाजरक्षणासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दलितांच्या हक्कांच्या निधीसाठी ‘पँथर आर्मी’चा मुंबईत एल्गार;
अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा आणि या निधीला कायदेशीर संरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी ‘पँथर आर्मी’ संघटना आता राज्यव्यापी लढा पुकारणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले यांनी दिला आहे.
जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्याचा अहवाल मांडला

▪️मेळाव्यात ७ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर
या मेळाव्यात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ७ महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले, ज्याची प्रत केंद्र व राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे:
ठराव क्रमांक १: आर्थिक न्याय आणि बजेट तरतूद
लोकसंख्येनुसार निधी: केंद्र व महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) साठी अर्थसंकल्पात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात (Special Component Plan) निधीची कायदेशीर तरतूद करावी.
निधी वळवण्यास बंदी (विशेष कायदा): आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर, SC/ST साठी राखीव असलेला निधी इतर विभागांकडे वळवण्यास किंवा तो अखर्चित ठेवण्यास प्रतिबंध करणारा ‘विशेष आर्थिक अधिकार कायदा’ तातडीने मंजूर करावा.
निधी कॅरी फॉरवर्ड: अर्थसंकल्पीय वर्ष संपल्यानंतर शिल्लक राहिलेला दलित व आदिवासी विकास निधी रद्द न होता, पुढील वर्षासाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ (Carry Forward) करण्याची तरतूद असावी.
ठराव क्रमांक २: महिला कल्याण आणि सामाजिक सुरक्षा
लाडकी बहीण योजना सुधारणा: जर ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी SC/ST राखीव निधीचा वापर केला जात असेल, तर या वर्गातील महिलांना प्रतिमहा १५०० रुपयांऐवजी १५,००० रुपये सन्मान निधी देण्यात यावा.
संजय गांधी निराधार योजना: विधवा, परितक्त्या, दिव्यांग आणि वृद्ध लाभार्थ्यांचे मानधन दरमहा ६,००० रुपये करावे. तसेच, या योजनेसाठी असलेली २१,००० रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रद्द करून ती २.५ लाख रुपये करण्यात यावी.
महिला कामगार सुरक्षा: घरेलू व बांधकाम महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघर, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना मालकाकडून मोफत सुरक्षित वाहतूक देण्याचा कायदा करावा.
ठराव क्रमांक ३: शिक्षण आणि विद्यार्थी विकास
परदेशी शिष्यवृत्ती: परदेशात शिक्षण घेणाऱ्या SC/ST विद्यार्थ्यांची संख्या वाढवून शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ करावी. तसेच, या विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक कर्जे पूर्णपणे माफ करावीत.
UGC आणि समता समिती: शैक्षणिक संस्थांमध्ये SC/ST/OBC विद्यार्थ्यांवर होणारा जातीय भेदभाव व अन्याय रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘समता समिती’ (Thorat Committee शिफारसींनुसार) बाबत प्रभावी मांडणी करावी.
ठराव क्रमांक ४: गृहनिर्माण आणि जमीन अधिकार
रमाई घरकुल योजना: घरांच्या बांधकामासाठी मिळणारे अनुदान अपुरे असून, ते वाढवून १० लाख रुपये करावे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना: भूमिहीन शेतमजुरांना बाजारभावानुसार जमिनी खरेदी करून द्याव्यात. तसेच, २०१८ पूर्वीच्या या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची थकीत कर्जे सरसकट माफ करावीत.
ठराव क्रमांक ५: उद्योजकता आणि रोजगार
व्याज परतावा व कर्ज योजना: आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर मागासवर्गीय महामंडळांना ‘व्याज परतावा योजना’ लागू करून ५० लाखांपर्यंत विनाव्याज कर्ज उपलब्ध करून द्यावे.
बेरोजगारी भत्ता: राज्यातील प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला दरमहा ६,००० रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात यावा.
ठराव क्रमांक ६: कायदा, सुव्यवस्था आणि जनगणना
अॅट्रॉसिटी कायदा: अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र ‘विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन करावे.
जातनिहाय जनगणना: सन २०२६-२७ च्या जनगणनेमध्ये OBC, भटक्या जमाती (VJNT) यांची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
ठराव क्रमांक ७: असंघटित व कष्टकरी कामगार कल्याण
कामगार पेन्शन: नोंदणीकृत बांधकाम आणि घरेलू कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ५,००० रुपये ‘सन्मान निवृत्ती वेतन’ लागू करावे.
गिग वर्कर्स संरक्षण: डिलिव्हरी बॉईज, कुरिअर आणि खासगी वाहतूक कामगारांसाठी स्वतंत्र ‘कल्याणकारी मंडळ’ स्थापन करून त्यांना विमा व किमान वेतनाचे संरक्षण द्यावे.
आरोग्य सुरक्षा: सर्व असंघटित कामगारांना (फेरीवाले, नाका कामगार इ.) ‘कल्याणकारी ओळखपत्र’ देऊन त्यांना १० लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा (महात्मा फुले जन आरोग्य योजना) लागू करावा.
वैद्यकीय कर्मचारी: खासगी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना (वॉर्ड बॉय, मावशी) किमान वेतन आणि जोखीम भत्ता (Hazard Allowance) बंधनकारक करावा.

मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार
या कार्यक्रमात ‘दैनिक दवंडी’च्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सामाजिक कृतज्ञता म्हणून दिलीप आसाराम आटपाळे , सारिका कोकणे , हसिना शब्बीर हलकर्णी, निशा प्रदिप कांबळे , ललिता दिपक कांबळे , लता संजय कोळी , सावित्री राजाराम कोळी या सह अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ भीमगीतकार सुरेश सातारकर व राजू कांबळे यांच्या उपस्थितीत जयभीम गायन पार्टीने क्रांतिकारी भीमगीते सादर केली.

यावेळी ‘दैनिक दवंडी’चे मुख्य संपादक विश्वास कांबळे, सरपंच डॉ. सी. डी. पाटील, बी. आर. कांबळे, सेनापती भोसले, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष बबन तांदळे, जिल्हा महासचिव नितेश कुमार दिशांत जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे महिला जिल्हाध्यक्षा छायाताई सातारकर, युवा जिल्हाध्यक्ष प्रा अमर ढंग करविर तालुका उपाध्यक्ष आनंदा तरटे ‘रेखा भोरे , अर्चना कांबळे राजू मोमीन, भैय्यासाहेब धनवडे कोल्हापुर जिल्हा कार्याध्यक्षा सोनाबाई वड्ड ‘ हातकणंगले तालुका सचिव राणी पोवार ‘ हातकणंगले तालका अल्पसंख्याक अध्यक्षा सोनम नदाफ ‘ उपाध्यक्षा समिरा नदाफ ‘ माधुरी कांबळे सुरेखा कांबळे इ शिरोळ तालुका कार्याध्यक्ष पिंटू वराळे ‘ आपलं व्यासपीठ चे संपादक लंकेश कांबळे दिपक कांबळे (लाला )’सुहास कामांन्ना’ साहिल कांबळेशोभा कांबळे निगृणा कांबळे लक्षी सुर्यवंशी सिंधू कांबळे आक्काताई कांबळे (पुशीरे ) इंदूबाई फुले लक्ष्मी कांबळे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ट भिम गितकार सुरेश सातारकर प्रस्तृत जयभिम गायन पार्टी हुपरी यांचा क्रांतीकारी भिम गितांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला .





नवे दानवाडमध्ये पँथर आर्मीचा ‘भीमगर्जना’ मेळावा; निधीच्या संरक्षणासाठी आता मुंबईत लढा!
शिका, संघटित व्हा आणि हक्कासाठी लढा; पँथर आर्मीच्या वर्धापन दिनी मान्यवरांचे आवाहन

