भारताचा श्रीलंकेला
मदतीचा हात
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
देशातील परकीय चलन संपुष्टात आल्याने राजपक्षे सरकार इंधनाच्या आयातीसाठी पैसे भरण्यासाठी संघर्ष करत असल्याने श्रीलंका खोल आर्थिक संकटात सापडत असल्याचे चित्र आहे.
अशा या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताने मदतीचा हात दिला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी भारत संकटमोचक म्हणून धावून आला आहे.
इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेल्या या देशाला भारताने फेब्रुवारीपासून चार खेपांमध्ये एकूण दीड लाख टन इंधन पाठविले आहे. यामध्ये जेट इंधन, पेट्रोल आणि डिझेल यांचा समावेश आहे, अशी माहिती श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी दिली.
कोरोना काळात पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसल्याने श्रीलंकेला मोठा आर्थिक फटका बसला असून या देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी या देशाने भारताकडे मदतीचा हात मागितल्यानंतर भारताने जानेवारी महिन्यापासून त्यांना सुमारे अडीच अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंचा पुरवठा केला असल्याचे बागले यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. श्रीलंकेला मदत म्हणून ५० कोटी डॉलर कर्ज पुरविण्याबाबत फेब्रुवारीमध्ये दोन देशांमध्ये करार झाला आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत दीड लाख टनांचे इंधन या श्रीलंकेला पुरविण्यात आले आहे. मे महिन्यापर्यंत आणखी पाच खेपांमध्ये मदत पुरविली जाणार आहे. शिवाय, अन्न, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी एक अब्ज डॉलरचे मदतरूपी कर्जही श्रीलंकेला दिले जाणार असल्याचे बागले यांनी सांगितले. या करारानुसार, श्रीलंकेला लवकरच तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे.
कर्जाच्या हप्त्यांमध्ये सवलतआर्थिक संकटातील श्रीलंकेला भारताने ४० कोटी डॉलरचे परकी चलन देण्याची आणि इंधन खरेदीसाठी ५० कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेने घेतलेल्या कर्जाचे हप्तेही भरण्यासाठी सवलत दिली आहे. भारताने अडचणीच्या काळात केलेल्या या मदतीबद्दल श्रीलंकेच्या जनतेकडून आभार व्यक्त होत आहेत, असे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी सांगितले.श्रीलंकेला मदत करण्याबाबतची चर्चा आणि त्यावर अंमलबजावणी, ही प्रक्रिया काही आठवड्यांमध्येच पूर्ण झाली. श्रीलंकेकडे परकी गंगाजळीचे प्रमाण कमी असल्याने त्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. अशा वेळी भारताने केलेली मदत श्रीलंकेच्या जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरली
श्रीलंकेत महागाईचा स्फोट
पेट्रोल पंपावर इंधनासाठी दोन किलोमीटर लांब रांगा लागत आहेत. खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की लोकांना उपाशी झोपावे लागत आहे. पेट्रोलपेक्षाही महाग दूध विकले जात आहे. एक कप चहाची किंमत १०० रुपयांवर गेली आहे. मिरची ७००रुपये किलोने विकली जात आहे. एक किलो बटाट्यासाठी २०० रुपये मोजावे लागत होते. वीजनिर्मितीवरही परिणाम झाला आहे. आता अनेक शहरांमध्ये १२ ते १५ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला तातडीने एक अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे.
भारताने श्रीलंकेला १ अब्ज डॉलरची क्रेडिट लाइन देण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे श्रीलंकेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भरून काढण्यास मदत होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. अशा परिस्थितीत भारतातून तांदळाची खेप श्रीलंकेत पोहोचल्यानंतर तिथल्या तांदळाच्या किमती खाली येण्याची अपेक्षा आहे, जे गेल्या वर्षभरात दुपटीने वाढले आहे.
९५६१५९४३०६