गझलसाद चे कविसंमेलन व मुशायरा रंगतदार
कोल्हापूर ता.१६, कविता थकलेल्या श्वासाला जगण्याचे भान देत असते आणि एकाकीपणाच्या वाटेवर साथही देत असते. कवितेला एक आंतरिक लय असते.ती अंतरिक लय गझल या काव्य प्रकारातून साधता येते.मराठीमध्ये शास्त्रशुद्ध गझल प्रस्थापित करण्याचे फार मोठे काम कविवर्य सुरेश भट यांनी केले. सुरेश भट यांच्या पासून प्रेरणा घेऊन गेली पाच वर्ष ‘गझलसाद ‘समूह काम करतो आहे. मराठीत शास्त्रशुद्ध गझल रुजवण्याचा गझलसादचा प्रयत्न हा अतिशय मौलिक आहे , असे मत नामवंत कवी डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते गझलसाद समूहाच्या वतीने सुरेश भट यांचा ९१ वा जन्मदिन आणि गझलसादचा पाचवा वर्धापन दिन या निमित्ताने आयोजित कवी संमेलन व मुशायऱ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गझलसादचे निमंत्रक प्रा.नरहर कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ गझलकार श्रीराम पचिंद्रे आणि डॉ. संजीवनी तोफखाने यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ. दिलीप कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गझलसादचे आधारस्तंभ सुभाष नागेशकर यांचा प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘आजही पुसले कुणी तर नेहमी हे सांगतो ,
मी गझल हा धर्म माझा, अन् भटांना मानतो ‘असा सुरेश भट यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तर ‘मी कधी कधी दिसणारा हंगामी तारा नाही,रांध्याच्या बंद मुठीचा तकलादू नारा नाही ‘ असा आढळपणा व्यक्त करण्यात आला. तर ‘मौनालाही शांतपणाने वाचत आहे कविता,जखमांनाही काळजामधे सजवत आहे कविता असा कवितेबद्दलचा विश्वास व्यक्त करण्यात आला.’ धुंद माझ्या कल्पनेला वास्तवाचे भान होते,शेवटी हे गीत माझ्या जीवनाचे दान होते’या शब्दात कविता आणि जीवन यांचा परस्पर संबंध व्यक्त करण्यात आला. ‘मला वाटते पिढीस पुढच्या संस्कारांचे आंदण द्यावे
प्रशस्त आहे सदनिका पण सांगा कुठले अंगण द्यावे?’या शब्दात सद्यस्थिती व्यक्त करण्यात आली.’भांडूणही मला ती जपते फुलाप्रमाणे,आता कधी तिच्याशी मी भांडणार नाही’अशी हळुवार प्रेम भावना व्यक्त करण्यात आली.तसेच ‘हास्य,करुणा प्रेम धाडस शांतता शृंगार अद्भुत ,नवरसांचे गूढ मिश्रण एकट्या बाईत आहे ‘या शब्दात स्त्रीची बलस्थाने स्पष्ट करण्यात आली.’अता ती पांढरी साडी कशी नेसेल समजेना,मुलीने फोडला होता फुगा रंगीत नसल्याने ‘या शब्दात स्त्रीचे वैचारिक भूमिका मांडण्यात आली. ‘शोधताना देव अल्ला बुद्ध येशूअंतरी माझ्याच पुन्हा भेटला तो ‘ या शब्दात स्वतःतील अस्सल मानवतेचा शोध घेण्यात आला.’एक कबूतर मनात झुरते संध्याकाळी,तुझी आठवण त्याला छळते संध्याकाळी’या शब्दात संध्याकाळची आठवण मांडण्यात आली. अशा अनेक प्रकारच्या रसानी हे कवी संमेलन व मुशायरा संपन्न झाला
या कवीसंमेलन व मुशायऱ्यामध्ये डॉ.दिलीप कुलकर्णी,श्रीराम पचिंद्रे, नरहर कुलकर्णी ,डॉ.दयानंद काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, विष्णू वासुदेव ,अनंत चौगले ,मनिषा रायजादे,वैभव चौगुले, प्रविण पुजारी,अरूण सुनगर ,शेरखान तांबट ,सारिका पाटील, हेमंत डांगे , डॉ. संजीवनी तोफखाने, डॉ.योगिनी कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी आदींनी आपल्या भावपूर्ण आशय संपन्न रचना सादर केल्या. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमोद गिरी,डॉ. उदय प्रकाश संत ,नीरज कुलकर्णी, सुधीर कुंभार, मनोहर पडवळे, विजय पत्रावळे, चंद्रकांत डोंगरे, सुभाष वाणी ,धनंजय पाटील, आकाश माडगूळकर, प्रतिशत मांगोलीकर ,संग्राम पिलारे ,उमेश नेरकर, प्रियंका चव्हाण, गीता बिदनुरकर ,अजित घळसासी, चंद्रकांत कामत, शरदचंद्र मोघे, बाळकृष्ण पाटील, मिलिंद कुलकर्णी, अनुप्रिता कुलकर्णी, वैशाली कांबळे ,वरुणा कुलकर्णी, पुंडलिक कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.योगिनी कुलकर्णी यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले. सारिका पाटील यांनी आभार मानले.