पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
मुंबई:—- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ९९ जणांची नावं आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपनं १६४ जागा लढवत १०५ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजप १५० ते १६० जागा लढवण्याच्या तयारीत आहे.
पहिल्या यादीत ९९ जणांचा समावेश आहे. या यादीत पहिली दोन नावं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आहेत.
फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम आणि बावनकुळेंना कामठीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे.
दरम्यान भाजपच्या पहिल्या यादीमध्ये पूर्वीच्या दोन आमदारांचं तिकिट कापण्यात आलं आहे. कामठी मतदारसंघामध्ये भाजपचे टेकचंद सावरकर हे आमदार होते.
मात्र यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदार संघातून अश्विनी जगताप यांच्याऐवजी भाजपकडून शकंर जगताप हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.*
भाजपकडून विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कन्म्बसी फॅक्टरचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी मुंबईत भाकरी फिरवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, उमेदवारी यादीवर नजर टाकल्यास भाजपने जुन्या आमदारांवर पुन्हा विश्वास दाखवल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या मिहीर कोटेचा यांना मुलुंडमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर राम कदम यांना घाटकोपर पश्चिम आणि तमिल सेल्वन यांना धारावीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.*
या दोघांचे तिकीट खराब कामगिरीमुळे कापले जाईल, अशी चर्चा होती.
मात्र, राम कदम यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काशी यात्रा, अयोध्या यात्रांचा जो सपाटा लावला होता, त्याचा त्यांना जनसंपर्काच्यादृष्टीने फायदा झाला आणि त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय, आशिष शेलार (वांद्रे पश्चिम ) आणि त्यांचे बंधू विनोद शेलार (मालाड पश्चिम) या दोन्ही बंधूंना भाजपने उमेदवारी दिली आहे.*