‘सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो आणि जीव घेतो!’
जातीय अत्याचाराच्या घटनांवरून प्रकाश आंबेडकरांचा सनातन धर्मावर तीव्र प्रहार
मुंबई: हरियाणातील आयपीएस अधिकारी पुरन कुमार यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सनातन धर्मावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. देशात अजूनही सनातनी विचारसरणीच्या प्रभावामुळे दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांना अन्याय सहन करावा लागत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
‘X’ वरून निशाणा
ॲड. आंबेडकरांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत सनातन धर्माला थेट लक्ष्य केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “सनातन धर्म = अस्पृश्यता. सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो आणि जीव घेतो!”
यासोबत त्यांनी जातीय भेदभाव आणि सामाजिक दडपशाहीमुळे मृत्यू झालेल्या डॉ. पायल तडवी, डॉ. रोहित वेमुला, आयपीएस अधिकारी पुरन कुमार आणि नांदेड मधील अक्षय भालेराव यांचे फोटो शेअर केले आहेत. या सर्वांचा मृत्यू जातीय भेदभावामुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अस्पृश्यता ही जीवघेणी व्यवस्था
ॲड. आंबेडकर यांनी त्यांच्या विधानावर जोर देत म्हटले आहे की, “अस्पृश्यता ही फक्त सामाजिक समस्या नाही, तर ती जीवघेणी व्यवस्था आहे.” सनातनी विचारधारेच्या प्रभावामुळे देशात दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला आजही मोठ्या प्रमाणात अन्याय सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जातीय भेदभावामुळे झालेल्या या मृत्यूंच्या घटनांनी समाजात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या प्रहाराने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Posted inमुंबई
सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो आणि जीव घेतो!’जातीय अत्याचाराच्या घटनांवरून प्रकाश आंबेडकरांचा सनातन धर्मावर तीव्र प्रहार
