वंचित बहुजन आघाडीचा मुंबईत ‘एल्गार’; पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांवर लाठीमार!
मुंबई: डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कथित स्त्रीविरोधी, अमानवी आणि अन्यायकारक विधानावर तीव्र आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीने मुंबईत मोठे आणि निर्णायक आंदोलन केले. पीडित स्त्रीलाच दोष देणाऱ्या आयोगाला ‘महिला आयोग’ म्हणायचं की ‘मनुवादी आयोग’? असा थेट सवाल उपस्थित करत महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
‘रुपाली चाकणकर राजीनामा द्या’ – महिला आघाडीची जोरदार मागणी
वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने राजधानी मुंबईच्या रस्त्यांवर उतरल्या होत्या. “रुपाली चाकणकर राजीनामा द्या” अशा गगनभेदी घोषणा देत वंचित बहुजन महिला आघाडीने डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
न्यायाच्या आवाजावर पुन्हा पोलिसांचा बळाचा वापर; कार्यकर्त्या जखमी!
मात्र, या न्यायाच्या आवाजावर पुन्हा एकदा पोलिसांच्या लाठ्यांचा मारा झाला. निषेध मोर्चा सुरू असताना आंदोलक महिलांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. महिला कार्यकर्त्यांना जबरदस्तीने फरफटत नेण्यात आले, तर काहींना मारहाण झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत अनेक महिला कार्यकर्त्या जखमी झाल्याची माहिती आहे.
वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध आणि सत्ताधाऱ्यांना स्पष्ट इशारा
पोलिसांच्या या अमानवी कृतीचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “आमच्या महिलांवर हात उचलणाऱ्यांना आम्ही गप्प बसू देणार नाही. न्याय मिळेपर्यंत रस्त्यावरचा संघर्ष सुरूच राहील.”
या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महिलांवर अन्याय करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाला लोकशाहीच्या मार्गाने चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे.
जनतेचा आक्रोश: “हा संघर्ष केवळ एका विधानाविरुद्ध नाही, तर महिलांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आहे. सरकार आणि प्रशासन कितीही दडपशाही करो, आम्ही न्याय मिळेपर्यंत लढू.” – वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचे मत.
