‘जातीभेद गाडून माणुसकीचा धर्म जपूया’; कोल्हापुरात मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन
कोल्हापूर | प्रतिनिधी:
“मानवता हाच आपला खरा धर्म आहे. निसर्गाने मानवा-मानवात कोणताही फरक केला नाही, मग समाजात जातीभेद का? आजही १८५ वर्षांपूर्वी मुक्ता साळवे यांनी उपस्थित केलेले प्रश्न अनुत्तरित आहेत, ही मोठी खंत आहे,” असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे यांनी केले.
कोल्हापूर येथे आयोजित आठव्या मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेतील विषमतेचे प्रतीक असलेल्या ‘मडक्यांची उतरंड’ लाठीने फोडून एक नवा क्रांतिकारी पायंडा पाडला.
संविधान सन्मान रॅलीने अवघी करवीरनगरी दुमदुमली
संमेलनाची सुरुवात अत्यंत उत्साहात ‘संविधान सन्मान रॅली’ने झाली. बिंदू चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून निघालेल्या या रॅलीत भारताचे संविधान, क्रांती योद्धा फकीरा, मुक्ता साळवे यांचा निबंध आणि फुले-शाहू-आंबेडकरी वाङ्मय पालखीत ठेवून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, हलगी, घुमक आणि लाठीकाठीच्या सादरीकरणाने रॅलीत चैतन्य भरले होते. विशेष म्हणजे, महापुरुषांच्या वेशभूषेतील मुलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
वैचारिक मंथन आणि पुरस्कारांचा वर्षाव
उद्घाटन सत्रात स्वागतोध्यक्षा डॉ. अर्चना जगतकर आणि संमेलनाध्यक्षा डॉ. नीलिमा जाधव-बंडेलू यांनी आपले विचार मांडले. दुपारच्या सत्रात ‘सत्यशोधक मुक्ता साळवे यांचा निबंध आणि समकालीन चळवळी’ या विषयावर परिसंवाद पार पडला. यात डॉ. सुवर्णा मोरे आणि प्रा. सुकुमार आवळे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘मुक्ता साळवे पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखक बाळासाहेब भडकवाड यांना ‘सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्यिक जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख ठराव आणि मागणी
संमेलनाच्या समारोपप्रसंगी काही महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले:
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा.
- मुक्ता साळवे यांचे समग्र साहित्य शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करावे.
- देशात तातडीने जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
या संमेलनासाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई आणि सातारा यांसारख्या विविध जिल्ह्यांतून शेकडो परिवर्तनवादी कार्यकर्ते व विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल महापुरे यांनी केले.
