दापोली : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट अनिधिकृतपणे बांधले असून ते तोडण्याची मागणी किरीट सोमय्यां कडून होते. आज सकाळी प्रतिकात्मक हातोडा घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाले. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दापोलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले त्यानंतर निलेश राणे आणि किरीट सोमय्या हे चार कार्यकर्त्यांसह दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. यानंतर किरीट सोमय्या हे पोलीस ठाण्यातून बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे.
पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर किरीट सोमय्या हे अनिल परब यांच्या रिसॉर्टच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. मात्र, लगेचच ते पुन्हा परतले आणि दापोली पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, “निलेश राणे यांनी आपल्याला सांगितलं आहे की किरीट सोमय्यांची हत्या.. असं कटकारस्थान दापोली पोलीस स्टेशनचे, रत्नागिरीचे एसपी आणि शिवसेनेचं झालं आहे असं दिसत आहे.”
किरीट सोमय्या यांनी पुढे म्हटलं, आम्ही मुंबई, रायगड, रत्नागिरीतून 200 वाहनांनी कार्यकर्ते आलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की, चौघे जण तुम्ही आत या आणि आम्ही चारच जण आतमध्ये गेलो. त्यानंतर तासाभरात आमच्या गाड्या, कार्यकर्त्यांना इथून अर्धा किलोमीटर दूर पाठवलं. आता ते कुठे आहेत ते माहिती नाहीत. दापोलीच्या गल्ल्या छोट्या आहेत. आता आम्हाला सांगतात तुम्हाला चौघांना जिथे जायचं आहे तिथे जा.
म्हणजे हा एसपी माफिया सेनेचा एक शाखाप्रमुख झालेला आहे. त्यांनी लिहून दिलं आहे मला की, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तुमचं घातपात करणार आहेत. हे मी नाही दिलंय तर रत्नागिरीच्या एसपींनी लिहून दिलं आहे की तुमचा घातपात होणार आहे म्हणून तुम्ही चारपेक्षा जास्त नकोत. हे काय पोलीस आहेत का? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला.
आम्हाला रिसॉर्टवर जाऊन दिलं जात नाहीये आणि आमच्या कार्यकर्त्यांनाही इथे येऊ दिलं जात नाहीये. आम्हाला रिसॉर्टवर जायचं आहे आणि आम्ही सर्वजण जाणार असंही किरीट सोमय्या म्हणाले. ते 25 कोटी रुपये वाझेच्या वसूलीचे आहेत की खरमाटेच्या ट्रान्सफरचे आहेत? हे पैसे आले कुठून याचा तपास झाला पाहिजे असंही किरीट सोमय्या म्हणाले.
अनिल परब काय म्हणाले?
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, हा रिसॉर्ट माझा नाहीये. ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. किरीट सोमयया पालिकेचे नोकर आहेत का…? किरीट सोमयाय वातावरण खराब करत आहेत. जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे. मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार, किरीट सोमय्या तोडायला कर्मचारी आहेत का? हिंमत असेल तर तोडून दाखवा.
अनिल परब यांनी पुढे म्हटलं, हिंमत असेल तर तोडून दाखवा. ते फक्त नौटंकी करत आहेत. हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले आहे. हे कोण ठरवणार रिसॉर्ट बेकायदेशीर आहे ते? जर कुठल्या कायद्याचा भांग झालेला आहे तर संबधित विभाग कारवाई करेल. माझे नाव मुद्दाम घेऊन वातावरण खराब करत आहेत. कोकणात ज्यांचे पाण्यात बंगले आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी.