इचलकरंजी/प्रतिनिधी –
तारदाळ गावाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या परिसरात वाढीव वस्ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून येथील नागरिकांसाठी या भागात आठवडा बाजाराची नितांत गरज आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाढीव भागासाठी आठवडा बाजार भरविण्यात यावा, अशी मागणी ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीने तारदाळच्या सरपंच सौ. पल्लवी पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तारदाळ गावाचा होत असलेला विस्तार व वाढते औद्योगिकरण सातत्याने वाढतच चालले आहे. त्या अनुषंगाने वाढीव वस्तीचा भागही मोठ्या प्रमाणात विस्तारत चालला आहे. यामध्ये जी.के.नगर, महात्मा गांधीनगर, कृष्णानगर, तुळजाभवानीनगर, हनुमाननगर, आझादनगर आदी भागाचा समावेश आहे. या भागात आठवडा बाजार भरत नसल्याने बाजारासाठी येथील नागरिकांना तारदाळ किंवा लगतच्या इचलकरंजी शहरात जावे लागले. हा भाग अधिकतर कामगारवस्तीचा असल्याने बाजारासाठी दूरवर जाणे न परवडणारे आहे. त्यामुळे वाढीव भागासाठी योग्य ती जागा बघून आठवडा बाजार भरवावा यासाठी ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उर्मिला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला आघाडी तारदाळ प्रमुख सौ. मेघा माने यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सौ. पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर बाजाराच्या दुसर्या दिवशी बाजारठिकाणी होणारा कचराही तातडीने उचलण्यात यावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी वंदना सुतार, स्वाती जाधव, राजश्री सारंग, छाया पवार, सचिन पवार आदी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
तारदाळ वाढीव भागासाठीआठवडा बाजार भरविण्यात यावा : ताराराणी पक्ष महिला आघाडीची मागणी
