बॅरिस्टरच्या स्वागताला फाटकी साडी टाळून जरीचा पटका नेसणारी ‘रमाई’! – त्यागाने फुललेले भीमरावांचे संसार चांदणे

बॅरिस्टरच्या स्वागताला फाटकी साडी टाळून जरीचा पटका नेसणारी ‘रमाई’! – त्यागाने फुललेले भीमरावांचे संसार चांदणे


बॅरिस्टरच्या स्वागताला फाटकी साडी टाळून जरीचा पटका नेसणारी ‘रमाई’! – त्यागाने फुललेले भीमरावांचे संसार चांदणे
भारतीय इतिहासात अनेक महान व्यक्तींच्या मागे त्यांच्या जीवनसाथीचा अविस्मरणीय त्याग दडलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात त्यांच्या पहिल्या पत्नी, माता रमाई आंबेडकर, यांचे स्थान असेच अलौकिक आणि त्यागपूर्ण आहे. रमाई म्हणजे केवळ पत्नी नव्हे, तर भीमरावांच्या संघर्षाची मूक साक्षीदार, त्यांची शक्ती आणि करुणेची मूर्तिमंत कविता!
आज अनेक माता-भगिनी ज्या सन्मानाने आणि निर्भयपणे जीवनाच्या प्रवासात पुढे जात आहेत, त्यामागे रमाईच्या एका प्रसंगातून स्पष्ट होणारा त्याग आणि आत्मसन्मानाची भावना आहे.
बॅरिस्टरचे आगमन आणि रमाईची कोंडी
साल होते 1923. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर (Barrister) होऊन भारतात परतले. त्यांच्या या महान यशाचे स्वागत करण्यासाठी हजारो लोकांचा जनसमुदाय मुंबईच्या बंदरावर जमला होता. लोकांच्या या गर्दीत रमाईही होत्या; पण त्यांच्या मनात एक वेगळाच संघर्ष सुरू होता.
रमाईंकडे नेसण्यासाठी केवळ एकच फाटकं लुगडं होतं.

“फाटलेलं लुगडं नेसून मी नवऱ्याच्या स्वागताला गेली, तर लोक बॅरिस्टरची बायको फाटकं लुगडं नेसून आली असं म्हणतील. माझ्या नवऱ्याची मान खाली जाईल. माझ्याकडून असं कांही घडणार नाही, कदापि घडणार नाही.”

पतीच्या सन्मानासाठी स्वतःच्या अस्तित्वाची पर्वा न करता, परिस्थितीचा अपमान गिळून जाण्याचा हा त्याग होता. पण स्वागताला जायचे तर होतेच! तेव्हा त्यांना आठवले— कुठल्याशा सत्कारात शाहू महाराजांनी भीमरावांना जरीचा पटका भेट दिला होता. रमाईने तो पटका काढला, तोच नेसला आणि ‘बॅरिस्टर’ पतीच्या स्वागताला गेल्या.
आसवे आसवांशी बोलली: भीमरावांच्या डोळ्यातील काळीज
रमाईने केलेली ही किमया हजारो लोकांच्या लक्षात आली नाही. पण ज्यांनी ‘उडत्या पाखराची पिसं’ मोजली, त्या प्रज्ञापुरुषाच्या, डॉ. आंबेडकरांच्या नजरेतून काही सुटले नाही.
भीमराव… जो माणूस शब्दांआधी अर्थ लक्षात घेणारा होता, त्याला पत्नीच्या त्या फाटक्या लुगड्यामागील आत्मसन्मान आणि जरीच्या पटक्यामागची तिची घालमेल दिसली. गर्दीत रमाईसाठी मोठ्याने रडता येणे शक्य नव्हते, पण बॅरिस्टर भीमराव त्यावेळी रमाईसाठी रडले. त्यांच्या डोळ्यातून आलेली आसवे केवळ रमाईच्याच आसवांनी भरलेल्या डोळ्यांना दिसली.
ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर म्हणतात, “यावेळी बाबासाहेबांच्या डोळ्यातून काळीज सांडत होतं आणि ते फक्त रमाईला दिसत होतं.”
रमाईच्या त्यागाची ती करुण कविता भीमराव वाचत होते. दोघांच्या डोळ्यांतील आसवे एकमेकांशी बोलत होती आणि दोन्ही काळजे एकमेकांशी संवाद साधत होती. हा संवाद जगाला दिसला नाही, पण तो दोघांच्या संघर्षाचा आधार होता.
रमाई: करुणेची कविता
भीमराव जेव्हा जयजयकारात घरी आले आणि दार ओलांडून आत आले, तेव्हा रमाईच्या मुखातून ‘साहेब!’ हा मनातील सर्व भावनांचा महोत्सव भरलेला उदगार बाहेर पडला. रमाईच्या आनंदाश्रूंनी बाबासाहेबांच्या पायातील दोन्ही बूट भिजले. तिच्या आसवांनी तिच्या मनावरचे कष्टाचे डोंगर आणि दुःखाचे पर्वत दूर केले. तिचे मन हलके झाले होते.
आज जी आपली माता, भगिनी मोठ्या आत्मविश्वासाने आणि सन्मानाने विविध रंगांच्या साड्या परिधान करत आहेत, त्यामागे रमाईचा हा त्याग आहे. रमाईचा त्याग केवळ भीमरावांना उच्च शिक्षण घेण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी एक अदृश्य आधारस्तंभ ठरला.
त्यांच्या या अलौकिक त्यागाला सलाम करण्यासाठी म्हणावेसे वाटते:
नांदणं नांदणं असं रमाचं नांदणं,
भिमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं.
रमाईचे जीवन आजही त्याग, करुणा आणि आत्मसन्मानाची प्रेरणा देणारे आहे.
(आधार: ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या ‘रमाई’ कांदबरीतून)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *