विश्वशांतीची चतुःसूत्री: भगवान महावीरांच्या विचारांचा आधुनिक मिलाप
लेखक: डॉ. रिता मदनलाल शेटीया
(संस्थापिका, रिता इंडिया फाउंडेशन)
पैसे, प्रसिद्धी आणि संपत्ती ही बाह्य साधने आहेत. काळाच्या ओघात इतर लोक ती आपल्याकडून हिरावून घेऊ शकतात, परंतु आपण मिळविलेले ज्ञान, संस्कार, शिक्षण आणि आपले उदात्त विचार ही अशी संपत्ती आहे जी कुणीही चोरू शकत नाही. हेच शाश्वत तत्वज्ञान सांगणारे, जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा आज (३१ मार्च २०२६) २६२५ वा जन्मकल्याणक महोत्सव. एका राजकुमाराचा ‘तीर्थंकर’ होण्यापर्यंतचा प्रवास हा केवळ वैयक्तिक मुक्तीचा प्रवास नव्हता, तर तो संपूर्ण मानवजातीला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ होता.
भगवान महावीरांच्या नावातील प्रत्येक अक्षर एका महापुरुषाची शक्ती सामावून आहे: ‘म’ – महादेव, ‘ह’ – हनुमान, ‘व’ – विष्णू आणि ‘र’ – राम. यातील प्रत्येक गुणाचा संगम त्यांच्या व्यक्तित्वात होता. त्यांनी जगाला दिलेल्या चार प्रमुख तत्त्वांचा – अनेकांतवाद, स्याद्वाद, अहिंसा आणि अपरिग्रह – आजच्या संघर्षाने भरलेल्या जगात अभ्यास करणे अनिवार्य आहे.
१. अनेकांतवाद: विचारांमधील लोकशाही (Diversity of Thoughts)
अनेकांतवाद म्हणजे सत्याला पाहण्याचे बहुआयामी दृष्टिकोन. सामान्य माणूस एखाद्या वस्तू किंवा घटनेकडे एकाच कोनातून पाहतो आणि त्यालाच संपूर्ण सत्य मानतो. भगवान महावीरांनी सांगितले की, सत्य हे ‘अनंत’ आहे आणि मानवी आकलन ‘मर्यादित’.
हत्ती आणि सात आंधळ्यांची कथा:
हे तत्त्व समजून घेण्यासाठी सात आंधळ्यांची आणि हत्तीची कथा अत्यंत समर्पक आहे. कुणी हत्तीच्या पायाला खांब मानले, तर कुणी शेपटीला दोरी. प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर होता, पण कुणाकडेही संपूर्ण हत्तीचे ज्ञान नव्हते. ‘अनेकांतवाद’ आपल्याला हे शिकवतो की, समोरच्या व्यक्तीचे मत आपल्यापेक्षा वेगळे असले तरी ते ‘चुकीचे’ असेलच असे नाही, तो कदाचित सत्याची दुसरी बाजू पाहत असेल. स्वतःच्या मताबद्दलची कट्टरता सोडणे आणि दुसऱ्याच्या मताचा आदर करणे, हीच खरी वैचारिक अहिंसा आहे.
२. स्याद्वाद: भाषेतील संयम आणि सापेक्षता
अनेकांतवाद हा जर विचारांचा पैलू असेल, तर ‘स्याद्वाद’ हा भाषेचा पैलू आहे. आपण जेव्हा एखादे विधान करतो, तेव्हा ते पूर्ण सत्य नसून ‘सापेक्ष सत्य’ असते. जैन दर्शनात ‘स्यात’ शब्दाचा अर्थ ‘एका विशिष्ट दृष्टिकोनातून’ असा होतो.
कोणत्याही शब्दांत एकाच वेळी सर्व गुण व्यक्त करण्याची क्षमता नसते. त्यामुळे बोलताना “माझेच म्हणणे खरे” (एकान्त) म्हणण्यापेक्षा “एका दृष्टिकोनातून हे असे असू शकते” (स्याद्वाद) असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरते. आजच्या काळात सोशल मीडियावरील वादविवाद किंवा राजकीय संघर्षात जर ‘स्याद्वाद’ वापरला, तर अनेक गैरसमज संपुष्टात येतील. ही केवळ भाषिक शैली नाही, तर सत्याचा नम्र स्वीकार आहे.
३. अहिंसा: केवळ कृतीत नव्हे, तर भावनेत
’अहिंसा परमो धर्म:’ हे ब्रीदवाक्य महावीरांच्या आयुष्याचे सार आहे. पण महावीरांची अहिंसा केवळ शारीरिक हत्येपर्यंत मर्यादित नव्हती. त्यांच्या मते:
- मनसा अहिंसा: मनात कुणाबद्दलही द्वेष न ठेवणे.
- वाचा अहिंसा: शब्दांनी कुणालाही न दुखावणे.
- कर्मणा अहिंसा: प्रत्यक्ष कृतीने कोणत्याही जीवाला इजा न पोहचवणे.
“आत्मन: प्रतिकूलानि परेषाम् न समाचरेत्” – जे आपल्याला आवडत नाही, ते आपण इतरांशी वागू नये. आपल्या जिभेच्या चोचल्यांसाठी किंवा स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांची हत्या करणे हे मानवतेला शोभणारे नाही. जेव्हा मानवाच्या आचरणात ही सर्वव्यापी अहिंसा येईल, तेव्हाच तो एक ‘पूर्ण व्यक्तित्व’ म्हणून घडेल.
४. अपरिग्रह: हव्यासमुक्तीकडून शांततेकडे
आजच्या उपभोक्तावादी (Consumerist) संस्कृतीत ‘अपरिग्रह’ हे तत्त्व सर्वात मोठे औषध आहे. ‘परिग्रह’ म्हणजे साठा करणे आणि ‘अपरिग्रह’ म्हणजे अनावश्यक गोष्टींचा त्याग करणे. मानवी इच्छा या समुद्रातील लाटांसारख्या आहेत, ज्या कधीही संपत नाहीत.
आजचे बहुतेक सामाजिक आणि आर्थिक गुन्हे – भ्रष्टाचार, चोरी, हिंसा – हे ‘संग्रह’ करण्याच्या वृत्तीतून निर्माण होतात. महावीरांनी सांगितले की, “पोट भरेल इतकेच ठेवा, पेटी भरेल इतके नाही.” विज्ञानाने सोयीसुविधा वाढवल्या पण माणसाची शांतता हिरावून घेतली. गरजेपेक्षा जास्त साठा करणे म्हणजे दुसऱ्याच्या वाट्याचे हिरावून घेणे होय. जर समाजाने ‘अपरिग्रह’ स्वीकारला, तर जगात आर्थिक विषमता राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने समाजवाद प्रस्थापित होईल.
आधुनिक काळातील प्रासंगिकता
भगवान महावीरांनी केवळ एक धर्म स्थापन केला नाही, तर त्यांनी जगण्याची एक ‘चळवळ’ उभी केली. त्यांचे विचार हे केवळ ग्रंथात पुजण्यासाठी नसून ते आचरणात आणण्यासाठी आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे भारतीय संस्कृतीचे वचन तेव्हाच सार्थ ठरेल, जेव्हा आपण इतरांच्या विचारांचा आदर (अनेकांतवाद) करू, संयमित बोलू (स्याद्वाद), सर्व सजीवांवर प्रेम करू (अहिंसा) आणि हाव सोडून समाधानी राहू (अपरिग्रह).
या जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने आपण महावीरांच्या केवळ मूर्तीची पूजा न करता, त्यांच्या गुणांची पूजा करूया आणि हे विश्व अधिक सुंदर, शांत आणि अहिंसक बनविण्याचा संकल्प करूया.
सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
