रत्नागिरी : कोकणात सध्या शिमग्याची धामधूम आहे. कोकणातील (Konkan) मोठा सण शिमगोत्सवाला (Shimga Festival 2020) सुरुवात झाली असून कोकणात विशेषत: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोंगर गावी शिमगोत्सवात पालखी नेण्यावरून दोन गटात वाद झाला. या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राजापूर पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे 41 जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगर गावात शिमगोत्सवातील मानपानावरून दोन गटात मागील काही वर्षांपासून वाद आहे. शुकवारी शिमगोत्सवानिमित्त दोन्ही गट ग्रामदेवतेच्या मंदिरात एकत्र जमले असता पालखी नेण्यावरून दोन्ही गटात वाद निर्माण झाला. या वादातून दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. यानंतर परस्परविरोधीत दोन्ही गटाकडून राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानुसार राजापूर पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे 41 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी संशयितांवर भादंवि कलम 143, 147, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करत आहेत.