सद्गुरु आनंद ऋषीजी म. सा.

सद्गुरु आनंद ऋषीजी म. सा.

सद्गुरु आनंद ऋषीजी म. सा.

स्कन्दपुराण (गुरुगीता) मध्ये गुरुचा महिमा खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलेला आहे.

“गुकारस्त्वन्धकार: स्याद, रुकार स्तेज उच्यते! अज्ञान ग्रासकं ब्रम्ह, गुरुदेव न संशय:!” गु शब्दाचा अर्थ अंधकार आहे, रु चा अर्थ तेज म्हणजेच अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारा तेज स्वरूप ब्रम्ह, “गुरु ” आहे. यात काहीही शंका नाही कि यापेक्षा सुंदर गुरूची व्याख्या होऊ शकेल, यालाच ‘सद् + गुरु’ म्हणजेच ‘सद्गुरु’ असे म्हणतात. चांगले आचार-विचार, उच्चार, वर्तन आणि कार्य याचा मिलाप होऊन गुरु ही ‘सद्गुरु’ बनत असतात. जैन धर्मातील असेच एक सद्गुरू म्हणजे आनंद ऋषीजी म.सा. आज त्यांची 34 वि पुण्यतिथी आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात.

सद्गुरु तो असतो जो सतविद्या प्रदान करतो. असत् विदयेपासून परावृत्त करणारा असतो. सम्यक ज्ञानाच्या प्रकाशात् स्वतः चालणारा आणि जगालाही हा मार्ग सांगणारा असतो, असेच होते आनंदबाबा ज्यांचे नाव आनंद, काम आनंद, जीवनामध्ये आनंद, वाणी आनंद, दृष्टी आनंद, संपूर्ण जीवनच आनंदाने ओतप्रेत भरलेले. ज्याप्रमाणे वटवृक्ष होण्यासाठी त्या बीजाला पृथ्वीच्या पोचत जावे लागते. (थोडक्यात अंधकारात जावे लागते.) तेव्हा कुठे ते बीज गगनाला टेकते. अगदी तसेच जीवन आनंद बाबांनी स्वतःचे बनवले. भ. महावीरांनी सांगितलेला मार्ग खडतर आहे, पण त्यावरच मी चालणार. हाच मार्ग सच्चम सच्चम थुई थुई मंगलम आहे.

“जरा मरण वेगेण, बुज्झमाणण पाणिनं । धम्मो दीवो पइठाय, गई सरणमुत्तम् ॥”

आनंद बाबांनी कधीही धर्म, जात, पंथ आणि कूळ असा भेदभाव केला नाही, म्हणून आजही इतर समाजातील लोक बाबांना मानतात. सद्गुरु यालाच तर म्हणतात, जो इतरांवर कोणतेही बंधन ठेवत नाही स्वतः वर कोणत्याही मर्यादा ठेवत नाही. महावीरांनी सांगितलेला एकतेचा मार्ग बाबांनी स्वीकारला. भक्तांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम बाबांनी केले. त्यांच्या जीवन चरित्रातातून निरंतर अध्यात्माची ऊर्जा मिळत राहते. बाबांजवळ असलेली नम्रता, विनम्रता, सरलता, मृदुता आणि विद्वतेने सारेच प्रभावित होत. एक वेळ एक महाशय त्यांची प्रसिद्धी, पाण्डित्य ऐकून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले आणि बाबाना म्हणाले, मी असे ऐकले आहे की, आपण फार विद्वान आहात. मी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरे दया, नाही तर मी संपूर्ण समाजापुढे सांगेल की आपण हरलात; यावर बाबा स्मित हास्य करत म्हणाले, बस! एवढी छोटी गोष्ट, घे मी आत्ताच हरलो.” ते महाशय टुकूर टुकूर पाहतच राहिले. त्यांचे मस्तक बाबा न पुढे नमले … आणि ते म्हणाले आज मला समजले कि सर्व धर्मीय आपणास का मानतात.

आचार्य श्री आनंद ऋषीजी श्रमण संस्कृतीचे अमृत पुरुष होते. त्यांचे जीवन लोककल्याण, लोकजागरण व आत्मसाधनेचे त्रिवेणी संगम होते. म्हणून त्यांच्या दर्शनात भक्तांना तीर्थयात्रेची अनुभूती होत होती. ते मानवीय मूल्यांचे उद्गाता होते. त्यांचे प्रवचन ऐकणाऱ्यांचा बोध जागृत व्हायचा. ते स्वप्न दाखवायचेही व स्वप्नांचे सर्जनही करायचे. त्यांचा जन्म वि. सं. १९५७ श्रावण शुक्ल १ प्रमाणे २६ जुलै, १९०० च्या शुभ दिनी महाराष्ट्रात अहमदनगरच्या सिराळ चिचोंडी या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील श्री. देवीचंदजी व माता हुलसा बाई हे खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते. तेरा वर्षांच्या छोट्या वयात नेमीचंदने गुरू रत्नऋषीजी महाराजांच्या चरणी विक्रम संवत १९७० मार्गशीर्ष शुक्ल ९, रविवारी मिरी गावात भगवती दीक्षा ग्रहण केली. २८ मार्च १९९२ रोजी त्यांचा जीवन प्रवास संपला.

असे म्हणतात कि, काही व्यक्तींना परिस्थिती उंचीवर नेते, तर काही परिस्थितीलाच उंचीवर नेतात. युग निर्मित करणारे आणि युग निर्माण करणारे असे दोन प्रकारचे युग पुरुष असतात. प्रथम श्रेणीचे युग नेता आवश्यकता पूरक असतात. जसे कि, जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहन सिंग आदी व दुसऱ्या श्रेणीत मध्ययुग निर्माण करणारे नेता असतात. आपले लक्ष्य, स्वप्न सत्यात उतरवणारे असतात, जसे सुभाषचंद्र बोस, ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि आचार्य आनंद ऋषीजी असेच एक युग निर्माता होते. जैन साधू-संतांची जीवन जगण्याची परंपरागत पद्धत आहे ती म्हणजे आत्मकेंद्रित साधना आणि लोकजीवन शैली.

आचार्य श्री आनंद ऋषीजी अध्यात्मनिष्ठा व साधना करत होते. त्यांनी लोकांना प्रबोधन केलेच व जनकल्याणाचा मार्गही दाखवला. जो परंपरागत नव्हता. परंपरेनुसार त्यांना संप्रदाय मिळाला; परंतु त्यांनी धर्मसंघाचे संघटन तयार केले. परंपरागत संकीर्ण व्यवस्थेतून त्यांनी साधू, साध्वी व सामान्य लोकांनासुद्धा सांप्रदायिक मनोवृत्ती व व्यवस्थेतून मुक्त करून विराट आणि उदार विचार व आचार दिले. श्री.व.स्था. जैन श्रमण संघाचे संघटन तयार केले व ३० वर्षांपर्यंत त्याचे कुशलतापूर्वक धुरा सांभाळली. त्यांच्या शिक्षणावेळी कोणतीही व्यवस्था नव्हती तरीही गुरू रत्नऋषीजींच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी उच्चतम शिक्षण पूर्ण केले. अनेक भाषांचे, लिपींचे त्यांना ज्ञान होते. त्यांचे शिक्षण खूपच विषम परिस्थितीत झाले, पण त्या परिस्थितीचा दुसरा कोणालाही सामना करावा लागू नये म्हणून वयाच्या ३६व्या वर्षी त्यांनी प्राथमिकपासून उच्चस्तरीय जैन धर्म दर्शन, आगम आणि भाषा यांची शिक्षण संप्रदायातील केंद्रीय शिक्षण संस्था निर्माण केली. त्याचे नाव आहे तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्ड. त्यांच्या तरुण अवस्थेत स्वाधीनता संग्राम चालू होता. तो महत्त्वपूर्ण उपक्रम होता. त्याच्यात राष्ट्रीय शिक्षण संस्थांचे निर्माण तेवढेच महत्त्वपूर्ण उपक्रम मानले जायचे; पण जैन साधूंकडून असे उपक्रम करणं सांप्रदायिक सामाजिक व्यवस्थेत मान्य नव्हतं. तरीसुद्धा गुरुवर्य श्री रत्नऋषीजी यांनी १९२३ मध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्था निर्मित केली आणि त्याचा पाठ्यक्रम तयार केला आनंद ऋषी यांनी. अध्यात्म साधना व मानवसेवेच्या कामात त्यांनी समन्वय केला. सामाजिक उपक्रमांचे आयोजन करताना अध्यात्मसाधनेत सिद्धी प्राप्त केली. अध्यात्म व समाजसाधना त्यांच्यासाठी परस्परविरोधी नसून पूरक होती. निरंतर श्रम हे त्यांनी जीवनाचं अभिन्न अंग बनवलं होतं. असे हे थोर युग पुरुष आजही त्यांचे अनुयायी त्यांचा मानवसेवेचा, जन कल्याणाचा वसा चालवत आहेत.

डॉ. रिता मदनलाल शेटीया

लेखिका रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *